
पुणे – बडोदा येथे होणार्या ८५ व्या अखिल भारतीयमराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्यमहामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, संमेलनाध्यक्षाची निवड नोव्हेंबर महिन्यात जाहीर होणार आहे, असे महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
८५ व्या साहित्यसंमेलनासाठी महाराष्ट्र साहित्यपरिषदेची वसई शाखा, मराठवाडा साहित्यपरिषदेची परभणी जिल्ह्यातील बाभूळगाव शाखा आणि बडोदा येथील मराठी वाङमयपरिषदेकडून निमंत्रणे आली होती. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५० व्या जयंतीचा योग साधत हे संमेलन बडोदा येथे घेण्याचा निर्णयमहामंडळाने घेतला आहे.
संमेलनाध्यक्ष पदासाठी साहित्यमहामंडळाच्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणूक कार्यक्रमानुसार ३ ऑगस्टपर्यंत साहित्यमहामंडळाच्या वतीने घटक व सलग्न संस्थाना मतदारयादी पाठविण्यात येणार आहेत. २२ ते ३० ऑगस्ट दरम्यान महामंडलाच्या घटक संस्था व सलग्न संस्थाकडे उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.५ सप्टेबरपर्यंत संमेलनाध्यक्षपदासाठीचे अर्ज निवडणूक कार्यालयात संबंधित संस्थाकडून येतील व याच दिवशी अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. तर १२ सप्टेबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील व अंतिम उमेदवार जाहीर करण्यात येतील.
मतदारांना मतपत्रिका २४ सप्टेंबर पासून पाठविण्यात येणार आहेत. मतदाराने ८ नोव्हेंबरपर्यंत मतपत्रिका निवडणूक अधिकार्याकडे पाठवायच्या आहेत. ९ नोव्हेंबर रोजी संमेलनाध्यक्षाची निवड जाहीर करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या वातीने कळविण्यात आले आहे.
साहित्यसंमेलनाध्यक्षांची निवडणुक राजकारणी लढवत नसले तरी सारस्वतांसाठी मानाचे स्थान असलेली निवडणुक मागील काही वर्षा पासून सातत्याने चर्चेत राहिली आहे. महाबळेश्वर येथील संमेलनासाठी जेष्ठ साहित्यीक डॉ. आनंद यादव यांची निवड करण्यात आली होती मात्र त्यांच्या कादंबरीवरून उठलेल्या वादळामुळे हे साहित्यसंमेलन विना अध्यक्षाचेच झाले होते. त्या नंतरच्या संमेलनाध्यक्षासाठीच्या निवडणुकाही चर्चा विषयराहिल्या आहेत यामुळे येणार्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोण उभे राहणार इथपासून या निवडणुकीत कोणत्या वाद विवादाला साहित्यजगत सामोरे जाणार हे पाहणे कुतूहल ठरणार आहे.
