काल पाकिस्तानात लाहोरहून कराचीला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळल्यामुळे ९०पेक्षा अधिक लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. स्वयंघोषित सिने समिक्षक अभिनेता कमाल खानने या दूर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड कलाकारांनी या विमान दुर्घटनेवर ट्विट का केले नाही? असा प्रश्न त्याने ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
एकेकाळी आपले भारतीय कलाकार पाकिस्तानमधील प्रत्येक घटनेवर ट्विट करायचे. पण याच कलाकारांकडे आज पाकिस्तानातील विमान अपघातावर बोलण्यासाठी शब्द नाहीत. ते दहशतीखाली आहेत का? हे कसले जगणे जगत आहात? इंग्रजांच्या काळातही लोक कधी एवढे घाबरत नव्हते, अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.
There was a time, when our actors were tweeting about each and everything of Pakistan. But today those actors are not having guts to say one word about #planecrash in Pak. Itna Darr! Ye Kaisi Zindagi JEE Rahe Hain! I don’t think ppl were scared, so much during British rule also.
— KRK (@kamaalrkhan) May 22, 2020
सोशल मीडियाच्या आडून कमाल खान कायम विविध क्षेत्रातील लोकांची नुसती उणीधुणी काढत असतो. त्याने यावेळी पाकिस्तान विमान अपघातावरुन बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. त्याचे या पार्श्वभूमीवरील हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पाकिस्तानातील कराची मधील मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते.