.png)
माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना काल २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. २ जी स्पेक्ट्रमचे परवाने देताना मनमानी करून आणि कायदा पायदळी तुडवून व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाने त्यांना अशारितीने परवाने देऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्या सूचनांची पत्रास न राखता त्यांनी काही कंपन्यांना स्वस्तात परवाने दिले. त्यातल्या काही कंपन्या तर दूरसंचार क्षेत्रात कार्यरतही नव्हत्या आणि अशा प्रकारची कामे करण्याची तांत्रिक क्षमताही त्यांनी विकसित केलेली नव्हती. तरीही त्यांना अतिशय स्वस्तात हे परवाने देण्यात आले, त्यांना ते मिळावेत यासाठी या परवान्यासाठीचे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये फेरफार करण्यात आले. अशारितीने ए. राजा यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर काही विशिष्ट कंपन्यांसाठी केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. महालेखापालांनी केलेल्या हिशोबानुसार ए. राजा यांच्या बेकायदा वर्तनामुळे देशाचे १ १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. प्रत्यक्षात सरकारला एवढे पैसे गमवावे लागलेले नाहीत, परंतु हे परवाने कायदेशीर मार्गाने दिले असते तर सरकारला एवढे पैसे मिळू शकले असते, असे महालेखापालांनी या क्षेत्राच्या सविस्तर अभ्यासातून दाखवून दिले आहे.
