पुन्हा एकदा काश्मीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने गरळ ओकली असून त्याचा हा व्हिडीओ भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शेअर केला आहे. आफ्रिदी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बरेच काही अभद्र बोलत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, शाहिद आफ्रिदीला भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरने चांगलेच सुनावले. तसेच, त्याचा १६ वर्षाचा उल्लेख करत त्याची खिल्ली देखील उडवली आहे.
शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत गरळ ओकण्यास सुरुवात केली. आफ्रिदी या व्हिडिओत म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. ते आज त्याच आजारावर सत्ता चालवत आहेत आणि आमच्या काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहे, त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल, असे तो व्हिडीओत म्हणत आहे.
Pak has 7 lakh force backed by 20 Cr ppl says 16 yr old man @SAfridiOfficial. Yet begging for Kashmir for 70 yrs. Jokers like Afridi, Imran & Bajwa can spew venom against India & PM @narendramodi ji to fool Pak ppl but won't get Kashmir till judgment day! Remember Bangladesh?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 17, 2020
आफ्रिदीने त्यानंतरही काश्मीर प्रश्नावरुन संताप व्यक्त करत नरेंद्र मोदींचा सर्वात डरपोक माणूस म्हणून उल्लेख केला आहे. काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक मोदींनी तैनात केले आहेत. एवढे सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत असल्याचेही आफ्रिदीने म्हटले आहे. गौतम गंभीरने आफ्रिदीच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शाहिद आफ्रिदची खिल्ली उडवत गंभीरने, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर देखील निशाणा साधला. पाकिस्तानच्या या तिन्ही महाशयांचा गौतमने जोकर असा उल्लेख केला आहे. ७ लाख सैन्य पाकिस्तानजवळ असून २० कोटी लोक या सैन्याच्या पाठीशी आहेत, असे १६ वर्षीय शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. तरीही काश्मीरसाठी मागील ७० वर्षांपासून भीक मागत असल्याचे सडेतोड उत्तर गंभीरने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आफ्रिदी, बाजवा आणि इम्रान खानसारखे लोक विष पसरवण्याचा काम करतात. पाकिस्तानी लोकांना त्याद्वारे हे मूर्ख बनवत आहेत, पण तुम्हाला काश्मीर निर्णय येईपर्यंतही मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतमने आफ्रिदीचा चांगला समाचार घेतला.