‘मनसे’च्या घुसखोरांविरोधातील मोर्चाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी


मुंबई : घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या मोर्चा काढणार असून त्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी फक्त आझाद मैदानात सभा घ्या असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. दक्षिण मुंबईत मोर्चाकरिता संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने मनाई असल्याचे पोलिसांनी म्हटल्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसेच्या या मोर्चाद्वारे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे. पण मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना मोर्चाच्या काही तास आधी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चौक सभांमधून निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143,144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत.

मनसे नेत्यांनी पोलिसांच्या या भूमिकेनंतर आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, पण आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलंच ढवळून निघत असल्याचे दिसून येत असल्यामुळे 9 फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment