देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले तर आनंदच होईल : एकनाथ खडसे


नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार का याबद्दलची चर्चा सुरु असतानाच त्याबद्दल महत्त्वाची टिपण्णी भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी केली आहे. दिल्ली जाणे, न जाणे हे फडणवीस नाही, तर तसा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी ठरवले होऊ शकतो, असे खडसेंनी म्हटले आहे.

या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. खडसे पुठे म्हणाले, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस दिल्ली गेले तर आनंदच होईल, मी त्याचे स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत गेले तर त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रालाच होईल, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे. गेल्या आठ दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते. ही जबाबदारी संपवून काल ते महाराष्ट्रात परतण्याआधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.

अनेकांचे फोन देवेंद्र फडणवीसांच्या काळात टॅपिंग झाल्याच्या आरोपावरुन चौकशी समिती नेमली गेली आहे. खडसेंचाही फोन टॅप झाल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या आहेत. खडसेंनी त्यावर बोलतानाही जोरदार नाराजी व्यक्त केली. माझा फोन टॅप केला असेल तर ते दुर्दैवी आहे. विरोधी पक्षनेते पदावर काम करताना त्या काळात फोन टॅपिंग होत असे हे अधिकाऱ्यांकडून ऐकत होतो. पण मी तेव्हा सत्ताधारी पक्षात होतो. तेव्हा माझ्यावर फोन टॅपिंगने पाळत ठेवण्याची काय गरज होती, त्यामागे नेमके कारण काय होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रक वाटण्यावरुन सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. खडसे त्यावर बोलताना म्हणाले की, पत्रक वाटताना प्रदेशाध्यक्ष दिसले यात मला आनंद आहे, मला अभिमान वाटला. प्रदेशाध्यक्ष झाले तरी त्यांच्यातील कार्यकर्ता अद्यापही जागा आहे. त्याचबरोबर दिल्लीत आल्यानंतर आपण राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेणार असल्याचेही खडसे म्हणाले.

Leave a Comment