आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार अतुल गोगावले


हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अजय-अतुल या जोडीने संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक अशी विविधांगी भूमिका पार पाडल्यानंतर या जोडीतील अतुल गोगावले आता पहिल्यांदाच आपल्या समोर एका नव्या रुपात येणार आहे.

लवकरच छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाची जबाबदारी अतुल गोगावले पार पाडणार आहेत. प्रजासत्ताक दिनापासून एका वृत्तवाहिनीवरील ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार असून अतुल गोगावले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ते महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहेत.

आम्ही या कार्यक्रमातून महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत असल्याचे अतुल यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावे माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील व्यक्तींची भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या अभिवंदनीय व्यक्तिमत्त्वात सर्वाधिक संख्या असून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग होता आले याचा मला खूप आनंद वाटत असल्याचे अतुल गोगावले यांनी सांगितले.

Leave a Comment