वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन सेना बाहेर


औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमासाठी आनंदराज आंबेडकर हे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी रिपब्लिकन सेनेची राज्यात पुन्हा उभारणी करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर घर तेथे रिपब्लिकन सेना, असे धोरण असून सेना गतिमान करणार आहे. वेगवेगळ्या गटातटाचे लोक आमच्याकडे येण्यास तयार असून वेगळी ताकद निर्माण करून समाज उभारणीचे काम करणार असल्याचेही आनंदराज आंबेडकरांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितमधील ओबीसी नेते हे नेते आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. ओबीसी नेत्यांसोबत ओबीसीची मते वंचितला मिळाली का? असा प्रश्न उपस्थित करत वंचितमधून बाहेर पडल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये जाहीर केले. रिपब्लिकन सेना यापुढे राज्यामध्ये वाढणार असून संघटनेची सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेची आंबेडकरी विचारावर आधारित ओळख होईल. रिपब्लिकन सेनेची वेगळी ओळख आहे. पण, आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्यासाठी पाठिंबा दिला. पण, अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही.

सर्व समाज सैरावैरा पळू लागला आहे. आपण त्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले असल्यामुळेच रिपब्लिकन पक्ष नव्याने उभारणी करत असल्याचे आनंदराज आंबेडकरांनी सांगितले. रिपब्लिकन सेना औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार असून तशी चाचपणी सुरू केल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

Leave a Comment