मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेवर वारंवार टीका करत आहेत. वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, राज्याला वाईट नेता मिळणे ही चूक महाराष्ट्राची नाही, पण त्या नेत्यासोबत राहणे हे मात्र चूकीचे असल्याची घणाघाती टीका केली आहे.
Having a bad leader was not Maharashtra’s Fault – But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019
अॅक्सिस बँकेच्या पश्चिम भारताच्या अमृता फडणवीस या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड आहेत. एसबीआयमध्ये अॅक्सिस बँकेमधील जवळपास दोन लाख पोलिस कर्मचाऱ्यांचे खाते वर्ग करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. विचारपूर्वक निर्णय सरकारने घ्यायला हवेत. बँकेतील खाते अशाप्रकारे वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर राज्याला वाईट नेता मिळणे ही चूक महाराष्ट्राची नाही, पण त्या नेत्यासोबत राहणे चुकीचे असल्याचे ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.