भाजपमध्ये हिंमत असेल तर बहुमत सिद्ध करुन दाखवावे – संजय राऊत


मुंबई – आज महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रिपदाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार हे परतण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे म्हटले आहे.

मला अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याची खात्री आहे. ते परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बहुमत सिद्ध करून दाखवावे. अजित पवार यांच्यासोबत सकाळी ८ आमदार होते. त्यापैकी पाच आमदार परत आले. तर नॉट रिचेबल असलेल्या धनंजय मुंडे यांच्याशीही संपर्क झाला असून सर्वजण लवकरच परत येतील. त्याचबरोबर अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचे पुरावे देखील वेळ आली की देऊ, असे राऊत म्हणाले. आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. आम्ही सरकार स्थापन करू आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. त्याचबरोबर अंधारात केवळ पाप होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या शपथविधीनंतर दु:ख व्यक्त केले होते. उभी फूट पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात पडली असल्याचे स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवल्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जे काही अजित पवार यांनी केले त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचेही ते म्हणाले होते.

Leave a Comment