अयोध्या निर्णयाविरोधात पुनर्याचिका दाखल करण्याबाबत लॉ बोर्डाची बैठक


लखनऊ – शनिवारी ९ नोव्हेंबरला अयोध्या जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार राम मंदिराला वादग्रस्त जागा मिळाली आहे तर पर्यायी ५ एकर जागा मशिदीसाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यामुळे येत्या १७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्याचिका दाखल करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. लखनऊमधील नवदा कॉलेजमध्ये ही बैठक होणार आहे.

१७ नोव्हेंबरला ही बैठक होणार असून पुनर्याचिका दाखल करायची की नाही, यावर या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच मशिदीसाठी ५ एकर पर्यायी जागा दिली आहे, ती मंजूर करुन घ्यावी की नाही, यावरही निर्णय होणार असल्याचे मुस्लिम पक्षकारांचे वकील जफरयाब जिलानी यांनी संगितले. सुन्नी वक्फ बोर्ड हा अयोध्या खटल्यात काही एकटाच पक्षकार नाही. यामध्ये इतरही मुस्लिम पक्ष आणि गट सहभागी आहेत. पण पुनर्याचिका बोर्डाच्या निर्णयानंतरच दाखल करायची की नाही, यावर निर्णय घेतला जाणार आहे, असे जिलानी यांनी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात आले तर काही मुस्लिम संघटनांनी आणि व्यक्तींनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment