
मनसेचे खळखट्याक नेते म्हणून ओळख असलेले नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी मनसेची साथ सोडत हाती शिवबंधन बांधून घेतल्यानंतर अनेकांनी नांदगावकर यांच्यावर टीका केली होती. नांदगावकरांना उमेदवारी न दिल्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देत काही मनसेतील काही नेत्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नितीन नांदगावकर यांनी म्हटले होते.
नितीन नांदगावकरांच्या निर्णयावर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया
यावर मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांनीदेखील आता आपली प्रतिक्रिया दिला आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात नितीन नांदगावकर यांनी खुप घाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनसेचे नितीन नांदगावकर हे चांगले कार्यकर्ते होते. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घाईत घेतला. भविष्यात त्यांना याची नक्की जाणीव होईल, असे जाधव यावेळी म्हणाले. तसेच त्यांना जर काही अडचणी होत्या तर त्या त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडवायला हव्या होत्या. त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता.
