बुंदेलखंडमधील बांदा जिल्ह्यातील जखनी गावाला निति आयोगाने ‘जलग्राम’ मॉडेल म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्वभुमीवर जलसंकटाचा सामना करावा लागत असलेल्या देशातील 1030 गावांना देखील जखनी गावाप्रमाणेच जलग्राम बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या गावातील गावकऱ्यांनी जागोजागी झाड लावत गावात हरित क्रांतीच केली आहे. यामुळे गावात पाणीसाठी भरपूर तयार झाला आहे. तलाव आणि नदी 12 महिने पाण्याने ओसांडत असते. संपुर्ण गावात शेती आहे व यामुळे इतर गावांच्या तुलनेत या गावातील तापमान देखील कमी आहे.
एकेकाळी दुष्काळाचा सामना करावा लागलेले जखनी गाव आता देशभरात एक उदाहरण तयार झाले आहे. केंद्र सरकारचे जल शक्ती सचिव युपी सिंह यांनी सांगितले की, जखनीमध्ये येणे हे मक्का-मदीनामध्ये येण्या सारखे आहे. जखनी गावात झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलचे कृषि वैज्ञानिक, नेपाळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बांदा येथील विद्यापीठातील विद्यार्थी देखील येतात.
जखनी गावाला पाणीदार बनवणारे उमाशंकर पांडे सांगतात की, वर्ष 2005 मध्ये दिल्लीमध्ये जल आणि ग्राम विकासाबद्दल एक कार्यशाळा झाली होती. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी शेतावर बांध बांधण्याविषयी सांगितले होते. आमच्या गावामध्ये असे कोणीच करत नाही. त्यानंतर मी माझ्या पाच एकर शेतीवर बांध बाधून पाणी रोखले. नोव्हेंबरमध्ये धान्य, डिसेंबरमध्ये गहू आणि एप्रिलमध्ये भाज्यांची शेती केली. सुरूवातीला 5 जणांनी अनुकरण केले, त्यानंतर हळुहळू सर्वच जण करू लागले.
जल शक्ती मंत्रालयाद्वारा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जल सप्ताहामध्ये उमाशंकर यांनी सांगितले की, बांध बनवल्याने 8 महिने शेतात पाणी राहते. इतर चार महिने ओलावा राहतो.यामुळे भूजल स्तर वाढला आणि शेतकरी चांगल्या पध्दतीने शेती करत आहेत. गावाच्या विहिरींमध्ये पाच फुटांवरच पाणी मिळत आहे. दुष्काळामुळे गाव सोडून गेलेले 2 हजार युवक आता परत आले आहेत.