
नवी दिल्ली – आर्थिक संकट असल्याने सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियावर नामुष्की ओढवली असून एअर इंडियाला करण्यात येणारा हवाई इंधनाच्या पुरवठ्यासह ६ विमानतळांवरील इंधन पुरवठा सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी थांबवला आहे. तेल कंपन्यांनी हे पाऊल एअर इंडियाने पैसे थकवल्याने उचलले आहे.
तेल कंपन्यांनी थांबवला एअर इंडियाचा इंधन पुरवठा
एअर इंडियाचा रांची, मोहाली, पाटना, विझाग, पुणे आणि कोचीन येथील विमानतळावरील हवाई इंधनाचा पुरवठा सरकारी तेल मार्केटिंग कंपनी (ओएमसी) इंडियन ऑईलने थांबविला आहे. इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले, की गुरुवारी संध्याकाळी हवाई इंधनाचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. एअर इंडियाशी आम्ही संपर्कात आहोत. त्यातून मार्ग निघेल, अशी आशा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे.
