
दुबई : पंचांची एक चूक किती महागात पडते याचा प्रत्यय आपल्या नुकत्याच पार विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाला. यात काही सामन्यांमध्ये एक नो बॉल संपूर्ण चित्र बदलू शकते. नो-बॉलचा निर्णय काही वेळा पंच देत नसल्यामुळे फलंदाज हा ऐन मोक्याच्या क्षणी आऊट होतो. त्यानंतर घेतलेल्या रिप्लेमध्ये तो चेंडू नो-बॉल असल्याचे निष्पण होते. आतापर्यंत अनेक वेळा अशा वादग्रस्त प्रसंग झाले असल्यामुळे या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने आता नो-बॉल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदिवसीय सामन्यांचे चित्र बदलणार आयसीसीचे ‘नो बॉल’ तंत्रज्ञान!
टिव्ही अम्पायरना सशक्त करण्यासाठी लवकरच नो-बॉल तंत्रज्ञानाचा आयसीसीच्या वतीने वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचे परिक्षण आधी कमी ओव्हरच्या सामन्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान काही महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात वापरले जाणार आहे. 2016 साली इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात याचे परिक्षण करण्यात आले होते, पण आता याची मोठ्या स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत आयसीसी वतीने अधिकृत माहिती मिळालेली नाही.
गोलंदाजाच्या पायावर या तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष नजर ठेवली जाणार आहे. जेव्हा गोलंदाज मैदानावर आपला पाय ठेवेल तेव्हा त्याजवळ असलेल्या कॅमेराच्या मदतीने तिसरे पंच नजर ठेऊ शकतात. पाय जर, लाईनच्या बाहेर असेल तर तिसरे पंच मैदानावरील पंचांना याबाबत माहिती देतील. दरम्यान डीआरएसच्या माध्यमातून सध्या नो-बॉल होता की नाही हे पाहिले जाते. तसेच, बीसीसीआयने केलेल्या मागणीनुसार भारतात होणाऱ्या सामन्यात याचा प्रयोग केला जाणार आहे.
