नवी दिल्ली – मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर चक्क शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पोस्टर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यांवर झळकल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या पोलिसांमध्येही अशाप्रकारचे पोस्टर पाहून गोंधळ उडाला. तेथील पोलिसांना हे पोस्टर हटवण्यात जवळपास पाच तासांचा वेळ लागला.
विशेष म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात हे बॅनर्स लावले होते. ज्या ठिकाणी बॅनर्स लावले गेले होते, त्याठिकाणी लगतच्या इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून त्याआधारे हे बॅनर्स कोणी लावले याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तेथील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित केले आहेत.
Dear all urgent request to share this on ur TL's….
MAHA BHARAT posters appearing on a v busy road of our Capital Islamabad in F-6 area…. @dcislamabad immediate attention n prompt action is required from u n ur team… pic.twitter.com/2EwEzkn2P1
— S malik (@sabrinamalik786) August 6, 2019
राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडल्यानंतर अत्यंत आक्रमक भाषण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. जम्मू काश्मीर आज घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास असल्याची गर्जना त्यांनी राज्यसभेत केली होती. राऊत यांच्या या भाषणानंतर इस्लामाबादमध्ये राज्यसभेत भाषण करतानाचा त्यांचा फोटो आणि त्यावर ‘महाभारत – स्टेप फॉरवर्ड’ असे लिहिलेली पोस्टर्स लागली.
राऊत यांनी केलेल्या आक्रमक विधानाचाच वापर या पोस्टर्सवर करण्यात आला होता. पाकिस्तानात याघटनेमुळे खळबळ उडाली होती, अशाप्रकारचे पोस्टर लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते, अखेर ते पोस्टर पोलिसानी हटवले असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत यांनी त्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना आपले पोस्टर्स पाकिस्तानात लागल्याबाबत आश्चर्य वाटले, इस्लामाबादमध्ये शिवसेनेचे पोस्टर्स लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे, शिवसेना आता इस्लामाबादमध्येही पोहोचली असून तेथे देखील शिवसेनेचे चाहते आहेत हे यावर नक्की होते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.