५ लाख पासून सुरुवात केली होती सीसीडीची; आज आहेत ८२०० कोटी चे मालक वी. जी. सिद्धार्थ


नवी दिल्ली – सोमवारपासून भाजप नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता असून सिद्धार्थ हे २९ जुलै रोजी बेंगळुरुला येत होते. ते त्याचदरम्यान बेपत्ता झाले. बेंगळुरूला येत असताना ते कारमधून उतरले, ज्यानंतर ते बेपत्ता झाले. ही बातमी पसरताच, एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. ते नेत्रावती नदीजवळ उतरले होते आणि तेथून अचानक बेपत्ता झाले.

सिद्धार्थ यांचा मोबाईलही सोमवारपासून स्विच ऑफ असल्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

सिद्धार्थ हे गायब झाल्यानंतरच हा मोठा खुलासा झाला. सिद्धार्थने कॅफे कॉफी डेच्या कर्मचार्‍यांना आणि संचालक मंडळाला पत्र लिहिले होते. पत्रात ते म्हणाले होते की प्रत्येक आर्थिक व्यवहार ही माझी जबाबदारी आहे, कायद्याने केवळ मला आणि फक्त मलाच जबाबदार धरावे. सिद्धार्थ यांनी लिहिले होते की माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना निराश करण्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. मी बराच काळ लढा देत आहे पण आज मी पराभव स्वीकारतो कारण मला खासगी इक्विटी सावकाराचा दबाव सहन करता येत नाही, ज्यामुळे मी समभाग परत घेण्यास भाग पाडत आहे. मित्राकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्यानंतर मी अर्धा व्यवहार सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केला आहे. ते म्हणाले आहेत की इतर सावकार देखील दबाव आणत होते, ज्यामुळे आपण परिस्थितीसमोर झुकलो आहोत.

सिद्धार्थ यांच्या शोधात पोलिस मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवित आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत कोणतीही खबर मिळाली नाही. असे सांगितले जात आहे की त्यांचा फोन अजूनही बंद आहे. त्यांच्या गायब झाल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहेत. मंगळुरुचे पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जात आहे. ते फोनवर कोणाशी बोलत होते हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

आपल्या माहितीसाठी व्ही.जी. सिद्धार्थ हे भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. केवळ पाच लाख रुपयांमध्ये त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता. सिद्धार्थ हे त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. म्हणून त्यांना ‘कॉफी किंग’ असेही म्हणतात. परिश्रम घेत सिद्धार्थ 5 लाख ते 8200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक झाले. या प्रवासात त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार देखील आले.

व्हीजी सिद्धार्थ यांचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर येथे झाला. त्याचे कुटुंब कॉफी उत्पादनाशी दीर्घ काळापासून संबंधित होते. सिद्धार्थ यांनी मंगलोर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सिद्धार्थला स्वतःहून काहीतरी करायचे होते, म्हणूनच त्यांनी वारसा हक्काने मिळालेले जीवन न जगता आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले की आपल्याला मुंबईला जायचे आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यावेळी पाच लाख रुपये दिले आणि सांगितले की जर तो अयशस्वी झाला तर तो परत येऊन कौटुंबिक व्यवसाय हाताळू शकेल. सिद्धार्थ यांनी पाच लाख रुपयांपैकी तीन लाख रुपयांची जमीन विकत घेतली आणि दोन लाख रुपये बँकेत जमा केले. यानंतर ते मुंबईत आले आणि जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस (सध्या जेएम मॉर्गन स्टेनली) मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरवात केली. तेथे त्यांनी दोन वर्षे काम केले.

दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणून नोकरी सोडल्यानंतर ते बंगळुरूला परतले. शिल्लक असलेल्या पैशातून त्यांनी एक वित्तीय कंपनी उघडण्याचे ठरविले. म्हणूनच त्यांनी सिवन सिक्युरिटीज सह त्यांचे स्वप्न साकार केले. ही कंपनी 2000 साली वे टू वेल्थ सिक्युरिटीज लि. बनली आणि ही कंपनी खूप यशस्वी झाली.

10 वर्षे सिद्धार्थ आर्थिक सेवांशी संबंधित होते. यानंतर 1996 मध्ये सिद्धार्थ यांनी कॅफे कॉफी डे ची सुरूवात केले. यात त्यांना अपार यश मिळाले. फक्त भारतच नाही, तर कंपनीचे आउटलेट बर्‍याच देशांमध्ये सुरु आहेत. ऑस्ट्रिया, कराची आणि दुबई येथेही कंपनीचे आऊटलेट आहेत.
कॅफे कॉफी डे ची थेट स्पर्धा टाटा ग्रुपच्या स्टारबक्ससोबत आहे. ही कंपनी स्टारबक्स व्यतिरिक्त बरिस्टा आणि कोस्टाशीही स्पर्धा करीत आहे. चायोसकडूनही कंपनीला तगडे आव्हान मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांत सीसीडीच्या विस्ताराची गती कमी झाली असून कंपनीचे कर्जही वाढले आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार मार्च 2019 पर्यंत कंपनीवर 6547.38 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

मार्च 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीत सीसीडीने 76.9 कोटी रुपयांची स्टँडअलोन निव्वळ विक्री नोंदविली होती. मार्च तिमाहीत सीसीडीचे 22.28 कोटी रुपयांचे नुकसान झाले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीचा हा आकडा 16.52 कोटी रुपये होता.

सिद्धार्थ यांनी ‘माइंडट्री’मध्येही गुंतवणूक केली आहे. सिद्धार्थ यांचा ‘माइंडट्री’ मध्ये 21 टक्के हिस्सा होता. तथापि, पूर्वी त्यांनी त्यांचे शेअर्स एलएन्डटीला विकले. त्यांना या करारामुळे सुमारे 2,858 कोटींचा फायदा झाला होता. जवळपास एक दशकापासून या कंपनीत ते गुंतवणूक करीत होते आणि 18 मार्च 2019 रोजी त्यांनी एल अँड टीसोबत 3,269 कोटी रुपयांचा करार केला होता.

गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती कि कोका-कोला कॅफे कॉफी डेची भागीदारी विकत घेऊ शकते. या संदर्भात दोन अधिकाऱ्यांयांनी सांगितले होते की कॅफे विभागात कोका-कोलाला आपली जागा अधिक मजबूत बनवायची आहे. अटलांटा येथील कोका-कोलाच्या मुख्यालयाकडून या प्रकरणाकडे पाहिले जात होते. असे म्हटले जाते की कोका कोला ग्लोबल टीमचे अधिकारी सीसीडीच्या व्यवस्थापनाशी बोलणी करत आहेत.