
हरिद्वार – लोकांचा विश्वास जिंकण्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यशस्वी ठरल्यामुळे आता ‘मोदी दिवस’ किंवा ‘लोक कल्याण दिवस’ म्हणून ‘२३ मे’ हा दिवस साजरा करण्यात यावा, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.
‘मोदी दिवस’ म्हणून २३ मे साजरा करण्यात यावा – रामदेव बाबा
‘महाआघाडी’ एका बाजूला होती आणि मोदी दुसऱ्या बाजूला एकटे होते. निवडणुका त्यांनी लढल्या आणि उत्तर प्रदेशातही उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. मोदींच्या हातात आता जनता सुरक्षित असल्याचे म्हणत नरेंद्र मोदींचे रामदेव यांनी कौतुक केले आहे. रामदेव यांनी लोकसंख्येची बेसुमार वाढ रोखण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या तिसऱ्या अपत्याला मतदान करण्याचा अधिकार नाकारावा,’ असे काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
त्याचबरोबर त्यांनी गाईंचे तस्कर आणि गोरक्षक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी गाईंना मारण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणीही केली आहे. जे मांसाहारी आहेत, त्यांना खाण्यासाठी इतर प्राण्यांचे मांस उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.
