आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक यांची देखील भारतीय संघात निवड झाली आहे. पण आम्ही आज तुम्हाला भारतीय संघातील खेळाडूंच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात फलंदाजीत अव्वल आहे. एका पाठोपाठ अनेक विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. त्याने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेटच्या सरावाला सुरूवात केली. 12 वी पर्यंतच त्याने शिक्षण घेतले आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी हा त्याच्या कारकिर्दीतील विश्वचषक खेळणार आहे. भारताने त्याच्याच नेतृत्वाखाली 2011 ला विश्वचषक जिंकला होती. क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणाऱ्या या खेळाडूला त्याचे 12 वी नंतरचे शिक्षण मात्र पूर्ण करता आले नाही.
विश्वचषकामध्ये उपकर्णधारपदाची धुरा सांभाळत असलेला रोहित शर्मासुद्धा 12 वी पर्यंतच शिकला आहे. त्याने 12 वी नंतर शिक्षणाऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.
इंटरपर्यंत भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षण झाले आहे. अभ्यासात त्याचे मन रमत नव्हते आणि त्याला क्रिकेटमधून वेळही देता येत नसे.
सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या केएल राहुलने खेळासोबतच अभ्यासाकडेही लक्ष दिले. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचे नाव घेतले जात होते. भारतीय संघातील दोन पदवीधरांपैकी तो एक आहे. त्याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
क्रिकेटमधील हार्दिक पांड्याचे रेकॉर्ड चांगले असले तरी अभ्यास मात्र खराब आहे. नववीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. त्यानंतर हार्दिक पांड्या कधीच शाळेकडे फिरकला नाही.
लहानपणापासूनच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला क्रिकेटचे वेड असल्यामुळे साहजिकच अभ्यास करणे म्हणजे एक दिव्य वाटायचे. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कॉलेजमध्ये प्रवेशच घेतला नाही.
क्रिकेटने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या जसप्रीत बुमराहला एवढे झपाटलेले होते की त्याला शाळेला जाण्याची कधीच इच्छा नव्हती. आई शिक्षिका असल्याने अभ्यासासाठी तगादा लावला जायचा. मात्र जेव्हा त्याच्यातील क्रिकेटमधील कौशल्य दिसले तेव्हा हायस्कूलचे शिक्षण झाल्यावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
उत्तर प्रदेशचा रहिवाशी असलेला भारताचा वेगवान आणि रिवर्स स्विंगमध्ये तरबेज असणारा गोलंदाज मोहम्मद शमी उत्तर प्रदेशच्या अंडर 19 संघात निवड न झाल्याने तो कोलकाताला गेला. त्याच्या शिक्षणाबद्दल स्पष्ट माहिती नाही मात्र, तो दहावीपर्यंत शिकल्याचे समजते.
तामिळनाडुचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड झालेला विजय शंकर केएल राहुलनंतर भारतीय संघातील विजय दुसरा पदवीधर खेळाडू आहे.
अशा कुटुंबातील केदार जाधव आहे जिथे सर्वांनी उच्चशिक्षण घेतले. त्याच्या तिनही बहिणींनी पीएचडी, इंजिनिअरिंग आणि एमबीए केले आहे. पण नववीतच केदार जाधवने शिक्षणाला रामराम ठोकला.