नवी दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात राफेल फेरविचार याचिकेवर सुनावणी झाली. सरकारने राफेलच्या पुराव्यांबाबत घेतलेले सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. त्याचबरोबर न्यायालयात याचिकाकर्त्याने नव्याने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरले जातील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारतर्फे न्यायालयात हे पुरावे ग्राह्य धरू नये, असे सांगण्यात आले होते. सरकारची ही विनंती न्यायालयाने फेटाळल्यामुळे मोदी सरकारला राफेल प्रकरणी हा मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने याप्रकरणाची सविस्तर सुनावणी नंतर होईल असे सांगितले आहे. न्यायालयाने राफेल प्रकरणी आमच्या याचिकेचा स्वीकार केला आहे आणि सरकारचा युक्तिवाद नाकारला असल्याचे याचिकाकर्ते अरुण शौरी यांनी सांगितले. १४ डिसेंबरच्या सुनावणीत राफेल कराराविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. राफेल करारात कोणतीही अनियमितता नसून हा करार देशासाठी आवश्यक असल्याचे मत खंडपीठाने नमूद केल्यामुळे विरोधकांना मोठा झटका बसला होता. पण, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.