
भारतीय लग्न म्हणजे एकूण गडबड गोंधळ, ऐनवेळच्या मागण्या, रुसवाफुगवा असा जंगी कार्यक्रम असतो. मांडवात येणाअगोदर नवरदेवाने किंवा त्याच्या आईने काही मागण्या करायच्या मग वधू कडच्यानी त्या पुरवायच्या असाही एक सोहळा बरेचवेळा होतो. महाराष्ट्रातील जालना येथे मात्र एक वेगळाच प्रकार घडला असून येथे लग्नाच्या मांडवात जाण्याअगोदर नवरदेवाने लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केली आणि नवरदेव लग्नाच्या पोशाखातच मित्र आणि कुटुंबियांसमवेत निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि सर्व कागदपात्रांची पूर्तता करून त्याने अर्ज दाखल केलाही. त्यामुळे या लग्नाची चर्चा झाली नसती तरच नवल.
मंडपात जाण्याअगोदर वरदेवाने दाखल केला उमेदवारी अर्ज
या नवरदेवाचे नाव आहे सुदाम इंगोले. तो मुलाचा जालनाच्या धारकल्याण गावाचा रहिवासी असून द्विपदवीधर आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. सुदाम यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी गावात होणार होता. त्यासाठी वरात निघाली आणि नवरदेवाने उमेदवारी अर्ज दाखल करूनच मांडवात जाण्याचा निर्णय घेतलं. सुदाम सांगतात, शेतकऱ्यांना शिव्या घालून राजकारण करणाऱ्या उमेदवाराला हरविण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. माझा जनतेवर विश्वास आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने मी जिंकेन अशी खात्री वाटते आहे. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडणूक लढवीत आहेत.
रावसाहेब दानवे यांनी काही काळापूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती त्यामुळे ते शेतकरी विरोधी असल्याची प्रतिमा या भागात निर्माण झाली आहे.
