
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 हुन अधिक जवानांना वीरमरण आले. संपूर्ण देशात या हल्ल्यानंतर संतापाची एकच लाट उसळली. या हल्ल्याचा निषेध हिंदी सिनेसृष्टीने देखील नोंदवला. त्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी देखील शहीद जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी पुढे आले.
वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावला भाईजान
दरम्यान शहीद जवानांच्या परिवाराला बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानची बिईंग ह्युमन या संस्थेने देखील मदतनिधी दिला आहे. सलमानने आपली मदत इतरांप्रमाणे सोशल मीडियावर जाहीर न करता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यामार्फत थेट ‘भारत के वीर’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सलमानचे किरेन रिजिजू यांनी कौतुकही केले आहे. ‘भारत के वीर’ या अकाऊंटद्वारे सलमानची ही मदत शहीद जवानांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.
