नवी दिल्ली – काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांविरुद्ध केंद्र सरकारने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर फास आवळायला सुरुवात केली असून सरकारने काश्मिर खोऱ्यातील सहा प्रमुख फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांना देण्यात आलेल्या गाड्या आणि इतर अन्य सुविधा काढून घेतल्या आहेत. यात मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी, फजल हक कुरेशी आणि शब्बीर शहा या नेत्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार पूर्वी राज्य सरकारने काश्मीरमधील विविध विचारप्रवाह असलेल्या संघटनांच्या नेत्यांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना नेत्यांना सुरक्षा पुरवली होती. ही सुरक्षा काल सायंकाळपासूनच काढून घेण्यात आल्यानंतरच्या काळात कोणत्याही परिस्थितीत अशा फुटीरवादी नेत्यांना सुरक्षा पुरवली जाणार नाही. दरम्यान, काश्मिर पोलीस अन्य अशा एखाद्या नेत्याला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे का, याची माहिती घेत आहेत.
काश्मीरमध्ये सुमारे ९०० हून अधिक जवान राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यात बहुतांश फुटीरवादी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षा आणि अन्य सुविधांवर दर वर्षी ११२ कोटी रुपये खर्च केले जातात. त्यात केंद्र सरकारचा ९० टक्के हिस्सा असतो. इतर नेत्यांच्या तुलनेत मीरवाईज उमर फारुखची सुरक्षा अत्यंत कडेकोट होती. सरकारच त्याच्या विमान प्रवास, हॉटेलचा खर्च आणि वैद्यकीय खर्च करते होते.