
प्रयागराज कुंभ मेळा आणि रापी नदीच्या काठी वसलेल्या गोरखपूर मधील खिचडी उत्सव उत्तरप्रदेश राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सांगणारे उत्सव म्हणता येतील. मकरसंक्रांतीला बाबा गोरखनाथ दरबारात खिचडी उत्सव साजरा करण्याची परंपरा असून त्यात नेपालचा राजपरिवारही सहभागी होत असतो. गोरखपूर हे अतिप्राचीन म्हणजे सुमारे २६०० वर्षे जुने ठिकाण आहेच पण या काळात या शहराचे ८ वेळा नाव बदलले गेले आहे. रामग्राम, पिप्पलीवन, गोरक्षपूर, सुबा ए सर्कीया, अख्तरनगर, गोरखपूर सरकार, मोअज्जमाबाद आणि आता गोरखपूर.
गोरखपूर- ८ वेळा नाव बदलले गेलेले शहर
सहाव्या शतकात ते रामग्राम होते. येथेच बुद्धांनी कोळी आणि शक्य यांच्यातील नदीजल वाद म्हणजे नदीच्या पाण्याचा वाद सोडविला होता. ७-८ शतकात येथे महायोगी गोरखनाथ यांच्या योग आणि तत्वज्ञानाचा बोलबाला होता. तेव्हापासूनचा येथे खिचडी उत्सव सुरु केला गेला असून मकरसंक्रांतिपासून महाशिवरात्री पर्यंत महिनाभर तो सुरु असतो. हे प्रामुख्याने हिंदू धर्मकेंद्र असले तरी येथील मुस्लीम या उत्सवात तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. येथील जत्रेत बहुतेक दुकाने आणि ठेले मुस्लीम बंधावानाचे असतात.

मुन्शी प्रेमचंद यांची ही कर्मभूमी. तसेच प्रसिद्ध गीता प्रेसचा कारभार येथूनच चालतो. सेट जयदयाळ गोयंका यांनी १९२३ साली गीता प्रेस स्थापन केला आणि येथून अत्तापर्यंत सर्व धर्मांची ६६ कोटी पुस्तके प्रकाशित केली गेली आहेत. त्यात १४ कोटी गीता आहेत.
आशियातील सर्वात मोठा सुन्नी संप्रदायाचा इमामबाडा येथे आहे. तसेच १७ व्या शतकातील १७०० एकरात पसरलेला अतिभव्य रामगढ तलाव मुंबईच्या मरीन ड्राईव्हपेक्षाही देखणा आहे. या शहरात जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म असून त्याची नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे. येथून १५ किमीवर असलेले औरंगाबाद तेथील टेराकोटा कारागारीसाठी देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. येथील रेल्वे संग्रहालय आणि मनोरंजन पार्क ही या शहराची अन्य आकर्षणे आहेत.
