
अहमदनगर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पक्षातील विद्यमान खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित आहे असे समजू नये, असा इशारा दिला आहे. सरकार व मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेने कितीही टीका केली तरी आमची युती करण्याची इच्छा आहे, रणांगण सोडून पळून जाणारे आम्ही नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षातील विद्यमान खासदारांनी आपली उमेदवारी निश्चित आहे असे समजू नये – रावसाहेब दानवे
शुक्रवारी अहमदनगरमध्ये खासदार रावसाहेब दानवे होते. त्यांनी रात्री उशिरा पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यांनी या बैठकीपूर्वी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ४८ पैकी ३६ मतदारसंघाचे दौरे पूर्ण झाले आहेत, भाजपकडे ज्या जागा नाहीत तेथेही दौरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मी दिल्लीतील बैठकीत उपस्थित होतो, अमित शहा यांनी असा कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही. ती बैठक केवळ रणनीती ठरवण्यासाठी होती, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. पक्षाची उमेदवार ठरवण्याची एक पद्धत आहे, लोकसभेचा उमेदवार त्यानुसारच ठरवला जाईल. कोणत्याही खासदाराने उमेदवारी निश्चित समजू नये, कामगिरी पाहूनच निर्णय घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.
