नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: मरण्यापेक्षा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण तशा सूचनाच कार्यकर्त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संताप अनावर झाला असल्यामुळे स्वत: मरण्यापेक्षा त्यांनाच ठोकून काढणे योग्य असल्याचे वक्तव्य शेट्टींनी केले. पैसा गोळा करण्याशिवाय दौऱ्यावर आलेले मंत्री काय करतात असा सवालही त्यांनी केला.
सरकार साखरेचे उत्पादन जास्त झाले तरी रडत का बसत आहे, असा प्रश्न उपस्थित करत पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी पक्ष तीव्र आंदोलन करणार आहे, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांचे कपडे काढा आणि ठोकून काढा, अशी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी काळातील आंदोलनाची भूमिका राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
आमचा संताप आता अनावर झाला आहे. आम्ही मरण्यापेक्षा यांनाच ठोकून काढावे हे जास्त योग्य असल्याचे ते यावेळी बोलले. तसेच दौऱ्यावर आलेले मंत्री पैसा गोळा करण्याशिवाय काही करत नाही, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. जिथे आंदोलन जास्त होते त्या भागात सर्वात जास्त चांगले चालणारे कारखाने आहेत. विदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन होत नसल्यामुळे इकडे सर्वात जास्त ऊस कारखाने बंद किंवा तोट्यात असल्यामुळे आंदोलन आणि ऊस कारखाने चालणे याचा काही संबंध नाही. ऊस कारखाने सर्वाधिक कर आणि रोजगार देतात. साखरे पेक्षा इथेनॉल तयार करायला आजकाल सांगण्यात येत, मात्र इथेनॉल कुणी घेत नाही. साखरेचे उत्पादन जास्त झाले तर सरकार रडत का बसते, असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.