अष्टपैलू हार्दिक पांड्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन

hardik-pandya
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून सराव सामन्यात जायबंद झालेला भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला माघार घ्यावी लागली आहे. हा निर्णय शॉ पूर्णपणे फिट नसल्यामुळे घेण्यात आला असून मयांक अग्रवालला सलामीचे कोडे सोडवण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. पृथ्वीचे संघातील स्थान मुरली विजय आणि लोकेश राहुल यांचे अपयश लक्षात घेता पक्के समजले जात होते. त्यात आता संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघ जाहीर केला.


दुखापतीतून हार्दिक पूर्णपणे सावरला असून त्याने रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने मुंबईत झालेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले. दुखापतीमुळे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर परतलेल्या हार्दिकने दमदार पुनरागमन करताना मुंबईविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपली छाप पाडली. त्याने 137 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 73 धावा केल्या, तर त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स व दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल.