पाच वर्षात ज्यांना आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही ते कसल्या राम मंदिर बांधण्याच्या बाता मारतात

ajit-pawar
जालना : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. पाच वर्षात ज्यांना आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्याच्या बाता कसल्या मारत आहेत? अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर अजित पवारांनी हल्लाबोल केला.

जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभ कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या मुंबई महानगर पालिका ताब्यात असताना, त्याचबरोबर शिवसेना सरकारमध्ये असताना पाच वर्षात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक ज्यांना बांधता येत नाही ते आम्हाला शिकवतात, अशी टीका अजित पवारांनी उद्धवे ठाकरेंवर केली.

राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा समोर आला आहे. राम मंदिरासाठी भाजप आग्रही असताना शिवसेनेनेही हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या २५ नोव्हेंबरच्या नियोजित राम जन्मभूमी अयोध्या दौऱ्यासंदर्भात चर्चा झाली..

Leave a Comment