
नवी दिल्ली – भारतात २० कोटींपेक्षा जास्त युजर्सना संदेश फक्त पाच चॅटपर्यंत पाठवता येण्याची मर्यादा सर्वात जलद संदेशवहनाचे माध्यम असलेल्या व्हाट्सअॅपने घातली आहे.
व्हाट्सअॅप मॅसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा
केंद्र सरकारने बनावट आणि उत्तेजक माहितीचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरलेल्या व्हाट्सअॅपला खडे बोल सुनावल्यानंतर व्हाट्सअॅपकडून ही पावले उचलण्यात आली आहे. मागील महिन्यात भारतात मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी व्हाट्सअॅपने पाच चॅटची मर्यादा ठरवण्यासाठी चाचणी घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
बुधवारी व्हाट्सअॅपने केलेल्या घोषणेनुसार, या आठवड्यापासून भारतातील लोकांसाठी ठराविक मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. सोबतच, युजर्सना शिक्षित करण्यासाठी व्हाट्सअॅपकडून एक व्हिडिओ प्रकाशित केला असून त्यात बनावट आणि खोट्या मॅसेजबद्दल माहिती मिळविण्यासाठीचे पर्याय दिले आहेत. जगभरातील युजर्सना कंपनी २० मॅसेज फॉरवर्ड करण्यास परवानगी देते.
