
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये पैसे नसल्याने पुन्हा एकदा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून देशातील विशेषतः बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. NO CASH असे फलक एटीएमच्या बाहेर लावण्यात आले आहेत. नागरीक रोख रकमेसाठी वारंवार एटीमच्या चकरा मारत आहेत. पण पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय.
देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा ‘चलन कल्लोळ’
पण एटीएममध्ये अचानक पैसे का नाहीत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. परिस्थिती एक-दोन दिवसात सामान्य होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी ही परिस्थिती आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे निर्माण झाल्याचे सांगितले आहे. अनेक राज्यांमध्ये सणासुदीचा काळ होता त्यामुळे येथे जास्त रोकड वागरिकांनी काढली त्यामुळे हा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.
