
मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने देशभरातील गृहकर्जधारकांना खुशखबर दिली असून २०१६ पूर्वी घेतलेल्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने काल (बुधवार) जाहीर करण्यात आलेल्या पतधोरणात देशभरातील बँकांना कर्ज परतफेडीसाठी आधार दरप्रणाली रद्द करण्याची ताकीद दिली असून, त्याऐवजी एमसीएलआर दर प्रणाली तातडीने लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१६ पूर्वी घेतलेल्या कर्जाचा हप्ता होणार कमी !
व्याजाचे दर रिझर्व बँकेने दिलेल्या आदेशानंतर काही अंशी खाली येण्याची शक्यता आहे. ज्या बँकांनी नव्या प्रणालीला टाळाटाळ केली होती, त्यांना ही प्रणाली लागू करावीच लागणार असल्यामुळे देशातील प्रत्येक बँकेतील गृहकर्जधारकाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. १ एप्रिल २०१८ पासून एमसीएलआर दर प्रणाली लागू होणार आहे. या आठवड्यापासून त्यासंबंधीचे नियम जारी करण्यात येतील. अनेक बँका ग्राहकांना या मोठ्या प्रमाणात बेस रेटवर (आधार दरप्रणाली) कर्ज देत होत्या. पण यापुढे रिझर्व बँकेच्या आदेशानुसार त्यांना एमसीएलआरनुसार कर्ज द्यावे लागणार आहे.
