मुंबईला आता अनिल अंबानी नाही तर अदानी करणार वीज पुरवठा


मुंबईला आतापर्यंत अनिल धीरूभाई अंबानी यांच्या रियालन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून वीजपुरवठा केला जात होता. पण अंबानींनी मुंबईतील वीज व्यवसाय आता अदानी समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिल धीरूभाई अंबानी समूह आर्थिक संकटात असून समूहातील विविध कंपन्यांवर मार्च २०१७ अखेर एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्यामुळे कंपनीने विविध व्यवसाय विकून कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आखले आहे.

त्यानुसार अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांच्या समूहांमध्ये कंपनीच्या ताब्यातील डहाणूचा ५०० मेगावॉटचा वीजप्रकल्प, वीजपारेषण यंत्रणा आणि मुंबईतील वीजवितरण व्यवसाय विकण्यासाठी बोलणी सुरू होती. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीने तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देऊन त्यांचा मुंबईतील वीजव्यवसाय विकत घेतला आहे.