
मुंबई – रिलायन्स कम्युनिकेशन आपला वायरलेस व्यवसाय पुढील तीस दिवसांत बंद करणार असल्याची चर्चा उद्योग विश्वात चालू असून ३० नोव्हेंबर हा कामाचा शेवटचा दिवस असेल असे कर्मचा-यांना सांगण्यात आले आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात मोफत व्हॉईस कॉलिंग आणि स्वस्त डेटा देण्यात येत असल्याचा फटका बसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन दूरसंचार क्षेत्रातून पडणार बाहेर
सध्याची कंपनीची आर्थिक स्थिती पाहता ३० दिवसांपेक्षा अधिक व्यवसाय पुढे नेता येणार नाही. वायरलेस व्यवसायात सध्या कंपनीला मोठा फटका बसत आहे. या क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या कंपन्यांकडून किफायतशीर दरात सेवा देण्यात आल्याने नुकसान होत आहे असे रिलायन्स टेलेकॉमचे व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांनी कर्मचा-यांना सांगितले आहे. आयएलडी व्हॉईस, कंझ्युमर व्हॉईस आणि ४जी डोन्गल पोस्टपेड सेवा सध्या नफ्यात असल्याने ती चालू राहील. याव्यतिरिक्त कंपनीचे दूरसंचार क्षेत्रातील अन्य व्यवसाय बंद करण्यात येतील. २१ नोव्हेंबर रोजी कंपनीचा डीटीएच परवाना संपणार आहे आणि परवाना नुतनीकरण करण्याचा विचार नसल्यामुळे डीटीएच सेवाही बंद करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.
