वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यामुळे देशातील आर्थिक व्यवहारांची गती मंद झाली आहे. मात्र देशात वाढीची शक्यता मजबूत असून जीएसटीमुळे आलेल्या अडचणी कमी झाल्यावर देशाच्या प्रगतीचा दर वाढेल, असे मॉर्गन स्टॅन्ले या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातील वाढीचा दर6.7 टक्के असेल, असा अंदाज या संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर5.7 टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे. निर्मिती क्षेत्रातील हालचाली मंदावल्या असून जीएसटीबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्याचा असर वाढीच्या दरावर झाला आहे.
मात्र एकूण मागणीतील घट म्हणून याकडे पाहू नये. भारतात वाढीच्या शक्यता मजबूत आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र पहिल्या तिमाहीत घट झाल्यामुळे मॉर्गन स्टॅन्लेने संपूर्ण वर्षभरासाठीच्या आपल्या वाढीच्या दराचा अंदाज सुधारून तो कमी केला आहे.