
मुंबई – एटीएममधील खडखडाट नोटाबंदी होऊन ६ महिने झाले तरी कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर २ महिन्यात परिस्थिती सुधारेल, असे सांगितले होते. पण, ६ महिने उलटूनही एटीएममध्ये पैशाचा तुटवडा कायम आहे. शहरातील ८० ते ९० टक्के तर ग्रामीण भागातील बहुतांश एटीएम रिकामे झाले आहेत.
एटीएममधील खडखडाट कायम, बँकांमध्ये चलन तुटवडा
तर बँकेतील धनादेश क्लिअर होण्यासाठी ३ दिवस लागणे अपेक्षित असताना आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागत आहेत. ही परिस्थिती आरबीआयकडून चलन पुरवठाच होत नसल्यामुळे उद्भवल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ही परिस्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.
पूर्वी एटीएममध्ये पैसे मिळत नसले तरी बँकेत पैसे मिळत होते. पण आता बँकेतदेखील पैसे मिळत नाहीत. शहरातील अनेक शाखांत व्यापारी पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर मोठी रक्कम असल्यास अर्धीच रक्कम मिळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बँकेत पैसे भरण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. गेल्या २ महिन्यांत आरबीआयकडून बँकांना आवश्यक तेवढा पैसा मिळालेला नाही.
