माणसाला येत्या १०० वर्षात सोडावी लागेल पृथ्वी


न्यूयॉर्क : मानवाला पृथ्वी सोडून येत्या १०० वर्षात नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल, असे भाकित ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केले आहे. पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य येत्या काही वर्षात राहणार नसल्याने हे पाऊल माणसाला उचलावेच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे शिष्य जगभ्रमंती करुन माणसाच्या परग्रहावरील वास्तव्याच्या शक्यतेवर ‘बीबीसी टीव्ही’च्या ‘टुमारोज वर्ल्ड’ या मालिकेतील ‘एक्स्पिडिशन न्यू अर्थ’ या डॉक्युमेंटरीमध्ये भाष्य करणार आहेत.

पृथ्वी हवामान बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे भकास होईल. त्यामुळे मानवाला राहण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल, असेही मत त्यांनी मांडले आहे. आपल्या हातून वेळ निसटून जात असल्यामुळे लवकर हालचाली केल्या नाहीत, तर अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावेच लागेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

माणसाने केलेली प्रगतीच ही त्यांच्यासाठी घातक ठरु शकते, असेही हॉकिंग म्हणाले. पृथ्वीचा विनाश माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे आणखी जवळ येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. माणूस विज्ञानाच्या प्रगतीमुळे परावलंबी होत चालला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन राहण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावल्याचा दावाही हॉकिंग्ज यांनी केला.

Leave a Comment