एटीएमने दिली मागितलेल्या रकमेच्या वीस पट रक्कम


टोंक – राजस्थानमधील टोंक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एटीएमने १०० च्या नोटाऐवजी २,००० च्या नोटा दिल्यामुळे ग्राहकांनी मागितलेल्या रकमेच्या वीस पट रक्कम त्यांना मिळू लागली. एटीएम पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार समजताच त्यांनी पटापट नोटा काढल्या. सरकारने नुकतेच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये केली आहे. बघता बघता ही बातमी टोंकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि काही तासांतच ६ लाख रुपये लोकांनी काढले.

प्रत्येक नोटांसाठी एटीएम मशीनमध्ये वेगळे कप्पे असतात. त्या-त्या कप्प्यांचा एक सांकेतिक क्रमांक असतो. विशिष्ट मूल्याच्या नोटा विशिष्ट कप्प्यामध्ये टाकणे हे बँक कर्मचाऱ्याचे काम असते. जर समजा चुकून १०० च्या कप्प्यात ५०० रुपयाची नोट गेली किंवा ५०० च्या कप्प्यामध्ये २०००ची नोट गेली असेल तर त्याचे सोयरसुतक एटीएम मशीनला नसते. ते केवळ दिलेल्या सूचनांचे पालन करते. एटीएम जेव्हा ग्राहकाला रोख काढण्याबद्दल विचारते तेव्हा त्यानंतर ग्राहक आपल्याला हवी असलेली किंमत एटीएममध्ये टाकतो. एका विशिष्ट अॅलगॉरिदमद्वारे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोटा ग्राहकाला कशा द्यायच्या याची सूचना एटीएमला मिळते. नोटांच्या संख्येची बेरीज करुन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा देण्याचे काम एटीएम करते.

टोंकच्या बँक ऑफ बडोद्याच्या एटीएममध्ये असेच काही झाले. ग्राहकांनी जेव्हा ५०० रुपये काढण्याची सूचना दिली तेव्हा एटीएमने त्यांना २००० च्या पाच नोटा दिल्या. ज्या लोकांनी १००० रुपये काढण्याची सूचना एटीएमला दिली तेव्हा एटीएमने त्यांना २००० च्या १० नोटा दिल्या. हैदराबाद येथील शमशाबाद विमानतळावर देखील असाच प्रकार घडला होता. १०० रुपयांच्या नोटांच्या कप्प्यांमध्ये बँक कर्मचाऱ्याने ५०० रुपयांच्या नोटा टाकल्या होत्या.

Leave a Comment