
नवी दिल्ली : भारतात रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बाजारात आल्यानंतर रिलायन्स जिओने नवनवीन कल्पना लढवून भारतातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.
जिओने बनवला एका मिनिटाला १००० ग्राहक जमवण्याचा विक्रम
बाजारात प्रवेश केल्यानंतर जिओने ८३ दिवसात पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आकडा पार केला आहे. तसेच कंपनीला प्रत्येक मिनिटाला १००० ग्राहक आणि पूर्ण दिवसाला तब्बल सहा लाख ग्राहक जोडले जात आहेत.
जगातील झपाट्याने प्रगती करणारी कंपनी रिलायन्स जिओ ठरली आहे. भारती एअरटेलचे सध्याच्या काळात २६.२९ करोड पेक्षा अधिक ग्राहक आहेत. तसेच वोडाफोनचे २९ कोटी आणि आयडियाचे १८ कोटी पेक्षा अधिक ग्राहक आहेत. एअरटेल, आयडिया, वोडाफोन सारख्या कंपन्यांना या यशापर्यंत पोहचण्यासाठी बारा ते तेरा वर्ष लागली. रिलायन्स कंपनीच्या रिलायन्स जिओने पाच सप्टेंबरला सेवेची सुरूवात केली होती. कंपनीकडे पूर्ण देशात ४जी इंटरनेट सेवा देण्याचा अधिकृत परवाना आहे. सप्टेंबर महिन्यात जिओ ग्राहकांची संख्या १.६ कोटी होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिओने पाच कोटीपेक्षा ही अधिकचा आकडा पार केला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ सध्या व्यावसायिक विश्वात सर्वोच्च स्थानावर आहे.
३० डिसेंबर २०१६ला जिओ कनेक्शन घेतल्यास जिओच्या सर्व सेवा ३१ डिसेंबर २०१६पर्यंत फ्री मिळणार आहेत. जानेवारी २०१७पर्यंत कंपनी बिलींग सुरू करणार आहे. त्यामध्ये कधी कधी डेटा वापर करणाऱ्यासाठी प्रतिदिन १९ रूपये आणि कमी डेटा वापरणाऱ्यासाठी महिना किमान १४९ रूपयांपर्यंत बिल येणार आहे. जिओने सांगितले की, आमची वॉईस आणि रोमिंग सेवा नेहमी फ्री असणार आहे.
