
रामभक्त हनुमानाच्या अनेक कथा आपल्याला माहिती असतात. जन्मल्याबरोबर बाल हनुमान सूर्याला गिळण्यासाठी आकाशाता झेपावल्याची कथाही आपण ऐकलेली असते मात्र या हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला असावा या संदर्भात खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. झारखंडमधील शेवटचा जिल्हा गुमला पासून २१ किमी अंतरावर असलेले अंाजनधाम हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला जातो व त्याचा पुरावा देणार्या अनेक जागा आजही येथे पाहायला मिळतात.
येथे घेतला होता बजरंगबली हनुमानाने जन्म
असे समजते की आंजनधामपासून जवळच पालकोट खडकात सुग्रीव गुंफा असून तेथेच किष्कींधाही आहे. हनुमानाची आई अंजनी रोज एका नव्या तलावात स्नान करून या तलावांच्या जवळ असलेल्या शिवलिंगाची पजा व जलाभिषेक करत असे. या ठिकाणी जवळपास ३६० तलाव व ३६० शिवलिंगेही आहेत. तिच्या नावावरूनच या ठिकाणाचे नांव आंजनेय किंवा अंजनधाम असे पडल्याचेही सांगितले जाते. अनेक ऋषी शांती मिळविण्यासाठी येथे तपासाठी येत असत व येथे महादेवाच्या पूजनाची प्राचीन परंपराही आहे.
या ठिकाणी आता अंजनी मंदिर बांधले गेले आहे. या मंदिराच्या खालीच सर्पगुहा आहे. भाविक या गुहेचे दर्शन आवर्जून घेतात. ही गुहा १५०० फूट लांबीची असून या गुहेतूनच माता अंजनी नदीवर जाऊन स्नान करत असे असा भाविकांचा विश्वास आहे. मंदिरात अंजनी व बालहनुमानाची मूर्ती पाहायला मिळते.
