
नवी दिल्ली: सध्याच्या काळात बँकेच्या व्यवहारांसाठी शाखेत जाण्याची आवश्यकता क्वचितच भासते. कारण बहुतेक बँक खातेदारांकडे ‘एटीएम कार्ड’ असते. मात्र हे कार्ड असलेल्या प्रत्येक खातेदारला त्याच्या बँकेकडून तब्बल ५ लाखांचे विमा संरक्षणदेखील दिले जाते. याची माहिती फारशा खातेदारांना असते आणि बँकाही ही माहिती देण्यास उत्सुक नसतात.
प्रत्येक एटीएमधारकाला हक्काचे विमा कवच
प्रत्यक्षात प्रत्येक बँक एटीएम कार्डधारकाचा २५ हजार ते ५ लाखांचा विमा उतरवते. दीर्घकाळ सुरू असलेल्या या योजनेची माहिती खातेदारांना नसल्याने ते या विमा संरक्षणापासून वंचित राहीले आहेत.
या योजनेनुसार अपघातात अपंगत्व आलेल्या अथवा मरण पावलेल्या खातेदाराला नियमांनुसार नुकसान भरपाई मिळते. या विमा संरक्षणासाठी खातेदाराला विम्याचा कोणताही हप्ता भरावा लागत नाही. हे अपघाती विमा संरक्षण १ लाखाच्या रकमेचे असते. तसेच मास्टरकार्ड धारकांना २ लाखांचा अपघात विमा मिळतो. याशिवाय एखाद्या दुर्घटनेत आलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणात ५० हजार ते १ लाखाची नुकसान भरपाईही मिळू शकते.
बँकेने हे विमा संरक्षण ग्राहकांना देणे आवश्यक असून ग्राहकांनी याची माहिती घेऊन आवश्यकता असल्यास या विम्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. एखाद्या बँकेने विमा संरक्षण नाकारल्यास वरिष्ठ व्यवस्थापकांकडे अथवा बँकींग लवादाकडे दाद मागणे आवश्यक आहे.
