
वॉशिंग्टन : कुठल्याही देशात दहशतवादी हल्ले झाले की, त्यात बळी पडलेल्यांच्या समर्थनार्थ प्रोफाईल पिक्चर बदलण्याची सोय फेसबुकवर आहे; पण या पुढे असे करता येणार नाही, असे फेसबुकने म्हटले असून कुठल्याही सबबीवर वापरकर्त्यांना प्रोफाईल चित्रे बदलता येणार नाहीत. पॅरिस हल्ल्याच्या वेळी बळी पडलेल्या व्यक्तींच्या सहानुभूतीसाठी अशा प्रकारे फेसबुक वापरकर्त्यांनी प्रोफाईल चित्रे बदलली होती त्यामुळे संबंधित ठिकाणी तुमचे नातेवाईक किंवा मित्र असतील तर त्यांची स्थिती कळत असते.
फेसबुकवर पक्षपातीपणाचा आरोप
आंतरराष्ट्रीय पातळीवर फेसबुक या समाजमाध्यम संकेतस्थळाच्या या निर्णयाने टीका झाली आहे. फ्रान्स व ब्रिटनमध्ये जे हल्ले झाले तितकेच गांभीर्य तुर्कस्तानातील कालच्या हल्ल्यालाही आहे मग आयव्हरी कोस्टमधील आदल्या दिवशी झालेल्या हल्ल्याच्या वेळी प्रोफाईल पिक्चर (छायाचित्रे) बदलण्यास फेसबुकने मनाई का केली हे समजू शकत नाही, असे वापरकत्र्यांचे मत आहे. जेव्हा पाश्चिमात्य लोक हल्ल्यात मारले जातात किंवा जखमी होतात तेव्हा सिक्युरिटी चेक (सुरक्षा स्थिती) हे उपयोजन चालू केले जाते व इतरत्र हल्ले झाले की बंद ठेवले जाते, हा पक्षपात आहे अशी टीका काही वापरकर्त्यांनी केली आहे. सिक्युरिटी चेक उपयोजन २०११ मध्ये जपानमध्ये त्सुनामी लाटा आल्या तेव्हा सुरू केले होते.
दु:खद घटनांची छायाचित्रे टाकणे बरोबर नाही, असे लोकांनी म्हटले होते; पण या छायाचित्रांचा एक उपयोग होता तो म्हणजे कोणी नातेवाईक बॉम्बस्फोट किंवा हल्ला झालेल्या देशात असतील तर प्रोफाईलमुळे ते कुठे आहेत हे कळत होते. आयव्हरी कोस्टमधील हल्ल्याच्या वेळी सिक्युरिटी चेक हे उपयोजन बंद ठेवण्यात आले तर तुर्कस्तानातील हल्ल्याच्या वेळी ते चालू करण्यात आले याबाबत आक्षेप घेण्यात आले. शेरील सँडबर्ग यांनी अपडेट पोस्टमध्ये अंकारातील हल्ल्याच्या वेळी उपयोजन चालू केल्याचे मान्य केले आहे. अंकारात हल्ला भयानक होता व त्यामुळे आम्ही सिक्युरिटी चेक म्हणजे सुरक्षा स्थिती उपयोजन चालू केले त्यामुळे कुणाचे मित्र, नातेवाईक सुरक्षित असतील, संकटात असतील तर ते कळणार होते.
हिंसाचार हा कुठल्या प्रश्नावर उत्तर नाही, असे सँडबर्ग यांनी म्हटले आहे; पण त्यांच्या पोस्टवर टीका झाली कारण आयव्हरी कोस्ट येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी सिक्युरिटी चेक उपयोजन बंद ठेवण्यात आले होते. हा दुजाभाव आहे असे लोकांचे मत आहे. लिओना फ्रँक यांनी म्हटले आहे की, आयव्हरी कोस्टमधील ग्रॅड बासम येथे हल्ला झाला तेव्हा सिक्युरिटी चेक उपयोजन तुम्ही चालू केले होते का? या प्रश्नाचे उत्तर द्या. मला माझे मित्र, कुटुंबीय सुरक्षित आहेत की नाहीत मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असोत ते समजले पाहिजे. जेव्हा पाश्चिमात्य लोक मरतात तेव्हाच सिक्युरिटी चेक चालू करणे, हा पक्षपात नाही का ?
