
दिल्ली- मोदी सरकारने देशात सध्या असलेले ९६ हजार किमीचे नॅशनल हायवेचे जाळे २ लाख किलोमीटरवर नेण्याच्या कामाला गती दिली असून त्यामुळे वाहतूक वाढेलच पण व्यवसायाच्या अनेक संधीही नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. अगदी २ ते ४ लाखांतही येथे व्यवसाय सुरू करता येणार असून त्यासाठी एनएचएआय कडून परवाना घ्यावा लागणार आहे.
नॅशनल हायवेवर व्यवसायाच्या संधी मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार हायवेंच्या दोन्ही बाजूला हायवे व्हिलेज बनविण्याची योजना सरकारने आखली आहे. ज्यांची जमीन हायवेला लागून असेल त्यांना परवाना घेऊन तेथे व्यवसाय सुरू करता येईल. कमी भांडवलात युटिलिटी शॉप्स, गेस्ट रूम्स तर थोड्या जादा गुंतवणुकीतून रेस्टॉरंट, फूड प्लाझा, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल, बाजार सुरू करता येणार आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना एनएचएआयकडून ती लीजवरही घेता येणार आहे. ज्यांच्याकडे जमीन आहे पण व्यवसाय सुरू करायचा नाही त्यांना ती भाड्याने एनएचएआयला देता येणार आहे.
हायवेवर ५० किमी अंतरावर रेस्टॉरंट काढता येतील व त्यासाठी अर्ज करून रितसर परवाना घ्यावा लागेल. तसेच देशभरात १२०० हायवे व्हिलेज वसविली जाणार आहेत. तेथे फूड प्लाझा, पेट्रोल पंप, बाजार, मॉल, रेस्टॉरंट असतील असे समजते.
