
नवी दिल्ली – सन २०१४-१५ मधील अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे आर्थिक फटका बसलेल्या अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामुळे १९६२.९९ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारीया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला होता व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे आर्थिक मदत मागितली होती.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मिळणार नुकसान भरपाई
या राज्यांकडून आलेल्या आर्थिक मदतीच्या प्रस्तावानंतर मंत्रालयीन गटांनी दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दिलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेशाला ७७७.३४ कोटी रुपये, कर्नाटकला २००.३५, आंध्र प्रदेशला २३७.५७ कोटी रुपये तर हरियाणाला १६८.८७ कोटी रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे.
