
दिल्ली – बिहारसह देशातील मागास राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या काळात गॅस कनेक्शन २४०० रूपयांऐवजी केवळ ८०० रूपयांत दिले जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांबरोबरच्या वार्तालापात सांगितले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात ठराविक कालावधीसाठी दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना गॅस कनेक्शनसाठी १६०० रूपयांची सवलत दिली जाणार आहे.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना ८०० रूपयांत गॅस कनेक्शन
प्रधान म्हणाले की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर एलपीजी योजनेचा लाभ आत्तापर्यंत ६ कोटी नागरिकांना मिळाला आहे. त्यांच्या गॅसवरील सब्सिडी थेट बँकेत जमा केली जाणार आहे. बिहारमधील १५ जिल्हे आणि देशातील एकूण ५५ जिल्ह्यात या योजनेची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्यात आला आहे. या योजनेमुळे गॅसच्या काळा बाजारावर नियंत्रण मिळविण्यात मोठीच मदत होत असल्याचे आणि यामुळे सरकारचे ८ कोटी रूपये वाचविण्यात यश आले असल्याचेही त्यातून दिसून आले आहे.
