
नागपूर – युती सरकारने हिवाळी अधिवेशना दरम्यान बळाचा वापर करून कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा तीव्र निषेध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानडी सरकारची सीमाभागातील बांधवांवर होत असलेली दडपशाही यापुढे कदापि सहन करणार नाही, असा सडेतोड इशारा यावेळी दिला.
सीमाभागातील दडपशाही सहन करणार नाही – मुख्यमंत्री
महाराष्ट्र सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागे खंबीरपणे उभा असून न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशा शब्दात सीमाभागातील मराठी बांधवांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या गळचेपीबद्दल विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा दिला.
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे मांडून राज्य सरकार हा लढा जिंकणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
