
नवी दिल्ली- भारतीय रिझव्र्ह बॅँकेने २००५ पूर्वी बनवलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यास आता केवळ १० दिवस उरले असून एक जानेवारी २०१५ पासून या नोटा व्यवहारात चालणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यास उरले १० दिवस
रिझव्र्ह बॅँकेने देशात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून ५०० आणि १००० च्या नोटांवर सुरक्षेची अधिक फिचर्स दिल्यामुळे या नोटांची नक्कल करणे सहजशक्य होत नाही. याचाच एक भाग म्हणून रिझव्र्ह बॅँक २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून काढण्यासाठी गेल्यावर्षीपासून मोहीम राबवत आहे. त्याला वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत ११४.६६ कोटी नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. या नोटांचे मूल्य ५२,८५५ कोटी होते.
२००५ पूर्वीच्या नोटांवर छपाईचे वर्ष नमूद केलेले नाही. मात्र, २००५ नंतर सर्व नोटांवर छपाईचे वर्षे छापलेले आहे. सुरक्षेसाठी या विविध उपाययोजना केल्या आहेत. रिझव्र्ह बॅँकेने दिलेल्या माहितीनुसार, १०० रुपयांच्या नोटांचे ७३.२ कोटी नोटा (७३२० कोटी), ५०० रुपयांच्या ५१.८५ कोटी नोटा (२५,९२५ कोटी), १००० रुपयांच्या १९.६१ कोटी (१९,६१० कोटी) यंदा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान बदलून दिल्या आहेत. एटीएमवरही २००५ पूर्वीच्या नोटा ठेवू नयेत, असे आदेश रिझव्र्ह बॅँकेने सर्व बॅँकांना दिले आहेत.
