हैदराबाद – पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सी. रंगराजन यांनी घाऊक महागाईचा दर शून्यावर आला असल्याने आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही आवाक्यात आल्या असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी आपल्या पतधोरणाचा आढावा घेताना प्रमुख कर्जांवरील व्याजदरात निश्चितच कपात जाहीर करेल, असे संकेत दिले आहेत.
तथापि, रंगराजन यांनी आरबीआयने आर्थिक आघाडीवर कुठलाही निर्णय घेताना शेअर आणि आर्थिक बाजारातील स्फोटक व्यवहारही विचारात घ्यायला हवे, असा इशाराही दिला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती निश्चितच आवाक्यात आल्या आहेत. महागाईचा दर आरबीआयच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी खाली आहे. त्यामुळे प्रमुख कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आरबीआयला काहीच अडचण यायला नको. पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच पतधोरणाचा तिमाही आढावा घेतला जाणार आहे. तेव्हा याबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.