
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने इंदू मिलच्या जागेवर बांधण्यास मान्यता दिली असून राज्य सरकार त्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तातडीने पूर्ण करेल व बाबासाहेबांच्या जयंतीला म्हणजे येत्या १४ एप्रिल रोजी या स्मारकाची पायाभरणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर केली.
आंबेडकर जयंतीला स्मारकाचे भूमिपूजन – मुख्यमंत्री
दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहिली.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोलिस पथकाद्वारे शासकीय मानवंदना देऊन चैत्यस्तुपावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे समतेचा व बंधुभावनेचा संदेश देशाला
दिला. आज याप्रसंगी आपण सर्वांनी महाराष्ट्रात समतेचे राज्य स्थापन करण्याचा संकल्प करु या. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यंदाही जनसागर उसळला. परंतु यंदाही भीमसैनिकांना आठआठ तास वंदन रांगेत उभे राहावे लागले. दुपार झाली तरी तेव्हा वंदन रांग वरळी सीफेसपर्यंत कायम होती. यंदा पालिकेने संपूर्ण शिवाजी पार्कवर मॅट टाकली होती. त्यामुळे धुळीचा त्रास झाला नाही. आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर स्नेहल आंबेकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महिला बालकल्याण मंत्री िवद्या ठाकूर, रिपाइं नेते रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री एकनाथ गायकवाड तसेच छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, हुसेन दलवाई आदींनी बाबासाहेबांना वंदन केले.
