
मुंबई – जे पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा स्वीकारूच, आमचे सरकार अल्पमतात नाही. सर्व चित्र १२ तारखेला स्पष्ट होईलच अशी भूमिका राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केली.
जे देतील त्यांचा पाठिंबा स्वीकारू – खडसे
एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे म्हणाले, ‘भाजपने रविवारी केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होताना शिवसेनेला सहभागी करून घेण्याचे ठरवले होते, पण ते आलेच नाहीत. राज्यातील परिस्थितीही वेगळी नाही. शिवसेनेच्या राज्यातील सत्तासहभागाविषयी मी आशावादी आहे. राज्यातील परिस्थिती फार बिकट आहे. अल्पमतात येऊन सरकार पाडणे हे कोणासाठीही हिताचे नाही, हे आता लक्षात आले आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याविषयी ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीने अगोदरच पाठिंबा जाहीर केला हे बरोबर आहे. यामुळेच १२ तारखेला चित्र स्पष्ट होईल. आता दोन दिवसांत आणखी घटना घडतील. मी आशावादी आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होऊ शकते. राज्य आणि केंद्र सरकार अशा दोन्ही स्तरावरील सत्तेत शिवसेनेने सामील व्हावे. निवडणुकीपूर्वी व नंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आता विसरून जावे.
