दिवाळी आलेली आहे. घरोघर लाडू, करंज्या, शंकरपाळी, चकल्या इत्यादी तळलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल होणार आहे. सुट्टी असल्यामुळे सारे लोक घरातच आहेत आणि घरात चोवीस तास घमघमाट सुटलेला असतो. अशा वातावरणात हे तेलकट खाद्य पदार्थ खाण्याचा मोह आवरल्याशिवाय रहात नाही. मात्र हे सारे फराळाचे जिन्नस खाताना काही पथ्ये पाळली तर त्यांचा आपल्या शरीराला आणि आरोग्याला कसलाही उपद्रव होत नाही.
दिवाळीचे खाद्य पदार्थ म्हणजे तेला-तुपाचा भडिमार आणि साखरेची रेलचेल. झालेच तर काजू, बदाम, पिस्ता, हरभर्याची दाळ अशा सगळ्या वातूळ पदार्थांची हजेरी असतेच. हे सगळे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, शक्यतो घरी तयार केलेलेच खाद्यपदार्थ खावेत. बाजारातून फराळाच्या जिनसा आणू नयेत आणि नाईलाजाने तशा आणाव्याच लागल्या तरी त्या लहान मुलांनी खाव्यात. वयस्कर लोकांनी त्यापासून दूर रहावे.
याचे कारण असे की, हलवायाच्या दुकानातून आणलेल्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते आणि मुळातच मधुमेहाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या भारतासारख्या देशात ही अतिरिक्त साखर पचत नाही. घरात सुद्धा गोड पदार्थ तयार करताना साखरच वापरावी. साखरेला पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम पदार्थ मिठाईत वापरू नयेत.
दिवाळीमध्ये परस्परांना भेट देताना मिठाईचे बॉक्स देण्याऐवजी पुस्तके द्यावीत. मिठाई द्यावीच लागली तरी शक्यतो गोड पदार्थ त्यात कमी असावेत. तुपामध्ये तळलेले पदार्थ तर अजिबात देऊ नयेत. शक्यतो फळे आणि सुका मेवा देण्याचा प्रयत्न करावा.